नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकरी धास्तावले राहुल गांधी काँग्रेसने कल्याणकारी योजनांतून जनतेची भीती दूर केली
पठाणकोट: मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांमुळे देशातील शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत, अशी टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी केली. यूपीए सरकारने मनरेगा योजना आणली. यासोबतच शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणे, शहर विकास मिशन, हरित व श्वेतक्रांती घडवत जनतेच्या मनातील भीती दूर केली, असा दावा त्यांनी केला. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाचे (आप) सरकार दिल्लीतील रिमोट कंट्रोलनुसार चालत असल्याचा टोला त्यांनी लगावला.
काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' गुरुवारी पंजाबमधील पठाणकोट शहरात पोहोचली. यावेळी राहुल गांधी यांनी सभेला संबोधित करीत प्रतिद्वंदी भाजप व आम आदमी पक्षावर हल्ला चढवला. भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशभरात द्वेष, हिंसाचार व भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. जात व धर्म व भाषेच्या आधारे भांडण लावण्याचे कार्य त्यांनी केले.
केंद्र सरकारच्या सर्वच योजना भीतिदायक असतात. प्रत्यक्षात त्याचा कोणालाही लाभ मिळत नाही. नवे कृषी कायदेसुद्धा तसेच होते. याउलट यूपीए सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. मनरेगा, शहर विकास मिशन, हरित व श्वेतक्रांती घडवत जनतेच्या मनातील भीती दूर केली, अशी टीका त्यांनी केली. शेतकरी पहाटे ४ वाजता उठून शेतात राबतो व देशाला जगवतो. या बदल्यात त्यांना केवळ सन्मान हवा आहे; पण भाजपने शेतकऱ्यांसाठी कृषी कायदे आणले.
त्यामुळे शेतकरीवर्ग धास्तावला आहे. त्यातच पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ जनतेला मिळत नाही. म्हणून शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला असून, त्यास केंद्र सरकार जबाबदार आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. देशातील लाखो तरुण सैन्यात भरती होऊ इच्छित आहेत; परंतु सरकारने आणलेल्या वादग्रस्त अग्निपथ योजनेमुळे युवकांच्या स्वप्नांचा चुराडा झाल्याचे ते म्हणाले.
