उद्धव ठाकरेंनी दखल घेऊन काढली समजूत
कल्याण : विरोधी पक्षावर टीका करण्याच्या नादात शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी कोविड काळामधील डॉक्टर आणि नर्सच्या सेवेबाबत केलेल्या विधानावरून डॉक्टरांमध्ये रोष निर्माण झाला. आयएमएसह कल्याणमधील प्रमुख वैद्यकीय संघटनांनी याबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केल्यावर थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच त्याची गंभीर दखल घेत डॉक्टरांची समजूत काढली.
खा. संजय राऊत यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना 'कोविडच्या सुरुवातीच्या काळात राज्यातील डॉक्टर्स आणि नर्स आपल्या जबाबदारीपासून पळून गेले' असे विधान केले. राज्यातील विविध डॉक्टर्स आणि त्यांच्या संघटनांपर्यंत या वक्तव्याची माहिती कळताच त्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. विशेषतः
कल्याण-डोंबिवलीतील डॉक्टर्स आणि त्यांच्या संघटनांनी तर उद्धव ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून राऊत यांच्या वक्तव्यावर आपली नाराजी जाहीर प्रकट केली. आयएमए कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांनी कल्याण जिल्हाप्रमुख विजय साळवी यांच्याशी संपर्क साधून खा. संजय राऊत यांच्या वक्तव्यावर परखड निषेध नोंदवला. त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर साळवी यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधून डॉक्टरांची नाराजी त्यांच्या कानावर घातली.
उद्धव ठाकरे यांनीही त्याची दखल घेत डॉ. प्रशांत पाटील यांच्याशी संपर्क साधला. महाविकास आघाडी सरकार असताना कोविड काळात डॉक्टर आर्मीच्या माध्यमातून कल्याण-डोंबिवलीतील खासगी डॉक्टरांनी केलेल्या कामाची आठवण डॉ. प्रशांत पाटील यांनी करून दिली. तसेच खा. राऊत यांनी डॉक्टर आणि नर्सबाबत असे विधान करायला नको होते, असेही सांगितले. त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही खासगी डॉक्टर आणि त्यांच्या संघटनांनी कोविडमध्ये केलेल्या कामाबाबत सहमती दर्शवली. तसेच राज्यातील सर्व डॉक्टर आणि त्यांच्या संघटनांवर आपला विश्वास आणि त्यांच्याती मनात आदर असल्याचे सांगत या वादावर पडदा टाकल्याचे डॉ. प्रशांत पाटील यांनी सांगितले.
